संक्रांत! नुसत्या नावानेही मनात एक चैतन्याची लहर उमटते. आकाशात उंच भरारी घेणारे रंगीबेरंगी पतंग, ‘काई पो छे’ चा जल्लोष आणि तीळगुळाची गोड चव… ही तर आपल्या संस्कृतीची गोड निशाणी! पण माझ्यासाठी यावर्षीची संक्रांत काहीतरी वेगळेच घेऊन आली. जणू एका रात्रीत या सणाचे अंतरंगच पालटले होते, आणि माझ्या बालपणीच्या आठवणींच्या साठवणीला एक नवी, किंचित बोचरी किनार लाभली.
काल मी पतंगांच्या शोधात निघालो होतो. पण दोन-चार दुकानांच्या पायऱ्या झिजवल्यावर लक्षात आले की पतंगांच्या विश्वात आता फक्त एक-दोनच तारे उरले आहेत. एकीकडे रंगीबेरंगी, दोरभरी छोटे-मोठे पतंग आणि दुसरीकडे प्लास्टिकच्या पन्नीत गुदमरलेले, चकचकीत पतंग! हे नवखे पतंग एका वेगळ्याच रूबाबदार पिशवीत बंद होऊन बाजारात अवतरले होते. कधीकाळी दोन, चार, फार तर पाच रुपयांना मुक्तपणे उडणारे हे कागदी पक्षी आता तीस आणि पन्नास रुपयांना एक अशा भावाने विकले जाऊ लागले, तेव्हाच मनात एक विचार घर करून गेला – आपली ती साधीभोळी संक्रांत आता केवळ बाजाराची गोष्ट बनली आहे का? मनाच्या तळघरात कुठेतरी एक अनामिक हुरहूर दाटून आली.
इथल्या पतंग विकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ‘डुग्गा’, ‘ढाच’ हे शब्द ऐकून एक प्रकारचा अनोळखी भाव दिसला. जणू काही ते परग्रहावरील शब्दांप्रमाणे होते. दक्षिणेकडे आणि मोठ्या शहरांत असल्याने आपल्या घरचे, मातीचे पतंग इथे मिळत नसतील कदाचित, पण असे पतंग इतर कुणी उडवतानाही दिसले नाहीत. मग मनात एकच स्वप्न तरळले – औरंगाबादला जाऊन आपले ते जुने, बालपणीचे ‘डुग्गा’ पतंग पुन्हा आणावेत.
मी डुग्गा, अंडा, ढाच… कितीतरी प्रकारचे पतंग उडवायचो. डुग्गा माझा जीव की प्राण! तो म्हणजे हवेत हलका, घिरट्या न घेता शांतपणे तरंगणारा एक स्वप्निल साथी. म्हणूनच त्याला मी जास्त उडवत असे. डुग्गा फारतर एक रुपयाला मिळे. रंगीत आणि दोरभरी पतंग दोन-तीन रुपयांना असत म्हणून मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे; मी खरंच मुलखाचा कंजूस होतो. पण तो ‘कंजूसपणा’ नव्हता, ती होती त्या साध्या आणि निर्मळ जीवनाची सवय, जिथे आनंदाची किंमत पैशात मोजली जात नसे.
वीस रुपयांत अख्खा आठवडाभर पतंगबाजी करण्यासाठी पुरेसा मांजा यायचा. असे फार तर पन्नास रुपये खर्च केले तरी मनाला भरभरून आनंद मिळे. काल मात्र एक-दोन दुकाने पालथी घालून सातशे रुपयांची ‘गुंतवणूक’ करून आमची पतंगबाजीची तयारी पूर्ण झाली. तीस-चाळीस रुपयांत पतंगबाजीचा राजा असलेला मी, जेव्हा पतंगाच्या दुकानात सातशे रुपयांचा युपीआय केला, तेव्हा खरंच काळजाला घर पडल्यासारखं झालं. तेव्हाच बदलत्या काळाची एक तेजस्वी पण कठोर छटा अनुभवायला मिळाली.
हे सारे बदल कदाचित मोठ्या शहरांतील चकाकीचे प्रतिबिंब असतील, पण आमच्यासारख्यांना ते नवीन आहेत आणि बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात हे बदल आत्मसात करावे लागणार आहेत. आज भलेही पतंगांचे रूप, किमती आणि खेळण्याची रीत बदलली असेल, पण संक्रांतीचा तो उत्साह, तीळगुळाची गोड आपुलकी आणि त्यामागील सलोख्याची भावना अजूनही तशीच आहे, हेच खरे! जुन्या आठवणींचा तो गोडवा मनात कायम एक कोपरा व्यापून राहील, आणि तोच आम्हाला या बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास बळ देईल.
